वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर माणिकपूर पोलिसांच्या जाळ्यात

वसई : वसई विरारसह मुंबई आणि ठाणे परिसरात चोर्या करणार्या एका अवलिया चोरास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या चोराने तब्बल ६५ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. वसईच्या शास्त्रीनगर येथील एका घरफोडीचा तपास माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत होते.
या वेळी सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत आतिष साखरकर (३६) याला अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीमधील १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील काही वर्षांपासून तो चोर्या करत आहे. त्याने यापूर्वी पालघर जिल्ह्यात एकूण ५७ चोर्या केल्या होत्या तर त्याच्या अटकेनंतर वसईतील माणिकपूर, मुंबईतील एमएचबी, विलेपार्ले, जुहू आणि गुजरात मधील उमरगाव पोलीस ठाण्यातील ५ चोर्या उघडकीस आल्या आहेत. आतापर्यंत त्याने एकूण ६५ चोर्या केल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपायुक्त ( परिमंडळ २) पूर्णिमी चौगुले यांनी सांगितले. यापुर्वी देखील त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा चोर्या करायला लागला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौदरी, गोविंद लवटे आदींच्या पथकाने या अवलिया चोराला पकडण्यात यश मिळवले.



